(चिकसे> — अनिल बोराडे सहसंपादक ):
साक्री तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असतानाच, लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे २८ ऑगस्टपासून काटवान भागासाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, हाच कालवा चिकसे, देगाव आणि गव्हाणीपाडा शिवारातून जात असूनही या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नसल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. “काटवानला पंधरा दिवस पाणी देता, मग चिकसे-देगावला कधी?” असा थेट सवाल करत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बातम्याचे ठळक मुद्दे:
* डोळ्यासमोर पाणी, पण शेत कोरडेच: उजवा कालवा चिकसे, देगाव व गव्हाणीपाडा परिसरातून वाहत असताना पिकांना पाण्याचा थेंबही मिळत नाही.
* सांडव्याच्या पाण्याचा वापराची मागणी: धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग चिकसे, देगाव व गव्हाणीपाडा शिवारातील पिकांसाठी किमान सात ते आठ दिवस करावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.
* पाण्याची आवक घटली: धरणाच्या सांडव्यावरून सध्या केवळ दोन सेंटीमीटर पाणी वाहत असून, पाऊस न आल्यास हे पाणीही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता कालवा निरीक्षक दर्शन कापडणीस यांनी वर्तवली आहे.
* मक्याची वाढ खुंटली: ६ ते ७ फूट वाढणारे मक्याचे ताटवे केवळ ३ ते ४ फुटांवर थांबले आहेत. वेळेआधीच कणसे निसवू लागल्याने दाणे अपक्व राहून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.
पाटबंधारे विभागाला निवेदन
पिकांची बिकट अवस्था पाहता, चिकसेचे माजी उपसरपंच संजय जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे, शेतकरी प्रकाश कापसे, नामदेव खैरनार, हिम्मत गायकवाड, शिवाजी खैरनार, दादाजी ठाकरे, विश्वनाथ वाघ, विजय चौधरी आणि गिरीधर एखंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी पिंपळनेर पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सचिन दुसाने यांना तातडीने निवेदन दिले.
प्रतिक्रिया
> “काटवानला १५ दिवस पाणी दिल्यानंतर चिकसे, देगाव व गव्हाणीपाडा परिसरातील पिकांसाठी किमान ७-८ दिवस पाणी सोडण्यात यावे. निर्णय घेण्यास विलंब झाला, तर शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान होईल.”
> “पावसाअभावी मक्याची वाढ खुंटून ३-४ फुटांवरच वेळेपूर्वी कणसे निसवू लागली आहेत. दाणे अपक्व राहिल्याने मोठे आर्थिक नुकसान होईल. पाटबंधारे विभागाने विलंब न करता पाणी उपलब्ध करून पिके वाचवावीत.”
प्रशासनाने तातडीने पाणी नियोजनाचा समतोल न साधल्यास शेतकरी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments