Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पांझरा नदीवरील पूल धोकादायक, साक्री-नांदवण रस्त्याची दुरवस्था; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिक त्रस्त

 सहसंपादक अनिल बोराडे 

नांदवण, दि. ११ जुलै: साक्री तालुक्यातील नांदवण आणि बेहेड गावांना साक्रीशी जोडणारा पांझरा नदीवरील फरशी पूल सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाच्या वरच्या बाजूला नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे, थोड्याशा पावसातही नदीला पूर येऊन पाणी पुलावरून वाहू लागते. यामुळे नांदवण, बेहेड गावांसह शिवपाडा आणि त्रिशूलपाडा या वस्त्यांचा साक्रीशी संपर्क तुटतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास ग्रामस्थांना तब्बल २० किलोमीटरचा वळसा घालून कासारेमार्गे साक्रीला जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.



दोन वर्षांपूर्वीची दुर्घटना, तरीही प्रशासन सुस्त

या धोकादायक पुलामुळे दोन वर्षांपूर्वी नाशिकहून परतणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुरात वाहून गेले होते. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नांदवण येथील ग्रामस्थ विकी माळचे, भाईदास पवार, सुरेश सोनवणे, शंकर माळचे, लक्ष्मण मोरे, सुनील पवार, लालचंद पवार यांनी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत. यामध्ये फरशी पुलाची उंची वाढवण्याची मागणी प्रमुख आहे. मात्र, अद्यापही नवीन पुलाच्या कामाबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.

ग्रामस्थ सुरेश सोनवणे यांच्या मते, फरशीच्या वरच्या बाजूकडील गाळ काढून मोरीचे पाईप मोकळे केल्यास पाणी पुलाखालून जाऊ शकते आणि पूल रहदारीसाठी उपलब्ध राहू शकतो.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रोजंदारीवर परिणाम

नांदवणपासून साक्री केवळ चार किलोमीटर अंतरावर असल्याने, अनेक तरुण रोजंदारीसाठी साक्रीला जातात आणि उशिरा रात्री परततात. पुलावरून पाणी वाहत असले तरी काही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अंधारात पुराचा अंदाज न आल्यास दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती शंकर माळचे, सुनील पवार आणि लक्ष्मण मोरे यांनी व्यक्त केली आहे.

नदीला पाणी असल्यास विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बसही अडकून पडते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या फरशी पुलाची समस्या त्वरित दूर करण्याची मागणी विद्यार्थी तसेच नांदवण आणि बेहेडच्या ग्रामस्थांनी केली आहे.

साक्री-बेहेड रस्त्याचीही दुरवस्था



पांझरा नदीवरील पुलाव्यतिरिक्त, साक्री ते बेहेड या नांदवणमार्गे जाणाऱ्या रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक करणे अत्यंत कठीण झाले आहे. शेतकरी, विद्यार्थी, रोजंदारी करणारे मजूर आणि इतर नागरिक या खराब रस्त्यामुळे त्रस्त आहेत. रिक्षा, दुचाकी, बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांमधून कसरत करत मार्ग काढावा लागतो.

या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती अनेक वर्षांपासून झालेली नाही, त्यामुळे दरवर्षी खड्ड्यांचा आकार आणि खोली वाढतच आहे. यामुळे नागरिकांचा त्रासही वाढत चालला आहे. साक्री ते बेहेड या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी संबंधित गावातील नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन पांझरा नदीवरील पुलाची उंची वाढवावी आणि साक्री-बेहेड रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, पावसाळ्यात नागरिकांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments