पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):
वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील सिताडीपाडा येथील राजमाथा परिसरात सहारा ग्रुपने पर्यावरण संवर्धनासाठी १,५०० वृक्षांची यशस्वी लागवड केली आहे. कोणत्याही सरकारी किंवा बाह्य मदतीची वाट न पाहता, स्वतः वर्गणी जमा करून आणि प्रत्यक्ष श्रमदान करून हा उपक्रम राबवण्यात आला.
१,५०० नवीन रोपांची लागवड आणि संगोपनाची जबाबदारी
पिंपळनेर येथील नर्सरीतून विविध प्रजातींची रोपे आणून राजमाथा परिसरात लावण्यात आली. यामध्ये निलगिरी, पेरू, मोह, टोकर (बांबू), साग, फुलकेसर, साधडा आणि जांभूळ यांसारख्या बहुउपयोगी झाडांचा समावेश आहे. केवळ झाडे लावण्यावर न थांबता, ही रोपे पूर्णपणे जगवण्याची आणि त्यांच्या नियमित संगोपनाची जबाबदारीही सहारा ग्रुपच्या सदस्यांनी घेतली आहे.
दोन वर्षांत २,५०० वृक्षांचे लक्ष्य पूर्ण
सहारा ग्रुपने सन २०२४ मध्ये याच परिसरात १,००० वृक्षांची लागवड केली होती. गेल्या दोन वर्षांत या झाडांची योग्य काळजी घेतल्यामुळे ही झाडे जोमाने वाढली आहेत. याच यशातून प्रेरणा घेत २०२६ मध्ये आणखी १,५०० रोपांची भर घालत एकूण २,५०० वृक्षांचे हरित क्षेत्र तयार केले आहे.
‘वर्गणी आमची, श्रमदान आमचे!’
ग्रामपंचायत वार्सा आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम पार पडला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणल्याबद्दल परिसरातून सहारा ग्रुपचे कौतुक होत आहे.
प्रमुख सहभाग:
या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य राजेश कुवर यांच्यासह वसंत राऊत, यशवंत कुवर, दिलीप राऊत, गोविंद राऊत, किरण कुवर, आकाश राऊत, शांतीलाल राऊत, कांतीलाल राऊत, दिलीप वळवी, सुनील राऊत, अविनाश राऊत, योव्हान कुवर आणि अजय राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.



Post a Comment
0 Comments